बलूच सैन्यासोबतच्या चकमकीत पाकिस्तानचे २३ सैनिक ठार   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या झटापटींमध्ये पाकिस्तानचे २३ सैनिक मारले गेले. या संघर्षात बलुच आर्मीचेही ९ सैनिक ठार झाले. बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जायंद बलूच यांनी एक निवेदन जारी केले आहे.
 
जायंद बलूच यांच्या निवेदनानुसार, ६ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्य मस्तंग परिसरात पुढे सरकत असताना बलूच लिबरेशन आर्मीसोबत त्यांची झटापट झाली. सकाळपर्यंत सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानचे आठ सैनिक ठार झाले. ८ जूनला आणखी एक चकमक झाली, त्यातही काही पाकिस्तानी सैनिक मारले गेले. बलूचिस्तानात अनेक भागात हा संघर्ष सुरू अद्याप सुरू आहे. मागील आठवडाभरातील या झटापटींमध्ये २३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.    
 
बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी सशस्त्र गट आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत, तरीही बलुच लढवय्ये वर्चस्व गाजवत आहेत. अलिकडेच, बलुचिस्तानमधील अनेक शहरे बलुच सैनिकांनी ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. बलुच गटांच्या यशाने संतप्त झालेल्या लष्कराने प्रांतातील नागरिकांविरुद्ध क्रूर मोहीम सुरू केली आहे. बलूचिस्तानात पुन्हा एकदा लोक अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. बलूचिस्तानात २ वेगवेगळ्या ठिकाणांहून ९ लोकांना बळजबरीने गायब करण्यात आले आहे. पासनीजवळ  सैनिकांनी यातील २ जणांना ताब्यात घेतले तर केचमधील दश्त बालनिगोर जिल्ह्यात इतर सात जणांना ताब्यात घेऊन अनोखळी ठिकाणी नेल्याचे बलूच नागरिक सांगतात. 
 

Related Articles